*फळ पिकांवरील समस्या सोडविण्यासाठी जैवतंत्रज्ञानचा प्रभावी वापर महत्त्वाचा-कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाने फळपिकांमध्ये फार मोठे संशोधन केले आहे. फळपिकातील घन लागवड तंत्रज्ञान हे राहुरी कृषि विद्यापीठाचे महत्त्वाचे संशोधन आहे. फळपिकांवर वातावरणातील बदलांचा मोठा परिणाम जाणवत आहे. फळपिकामध्ये फळांची गळती तसेच इतरही समस्या आहेत. जैवतंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने फळपिकांवरील समस्या सोडवण्यासाठी मदत होऊ शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या उद्यानविद्या (फळपिके) विभागातील प्राध्यापकांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्रामार्फत फळपिकांमध्ये जैविक आणि अजैविक ताण व्यवस्थापनासाठी जैवतंत्रज्ञान आणि पारंपारिक दृष्टिकोन या विषयावरील 21 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक डॉ. बी.टी. पाटील उपस्थित होते.

 यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यामध्ये फळपिकांचा मोठा वाटा आहे. भारतामध्ये 369 दशलक्ष टन फळपिकांचे उत्पादन होते. यावरून भारताच्या विकासामध्ये फळपिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सिद्ध होते. राहुरी कृषि विद्यापीठाने फळपिकांमध्ये महत्त्वाचे असलेल्या डाळिंब पिकामध्ये फुले भगवा, फुले सुपर भगवा यासारखे संपूर्ण भारतात लागवडीमध्ये मोठे क्षेत्र असलेले वाण दिले आहेत. फळपिकातील महत्त्वाच्या तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित केलेल्या आहेत. या 21 दिवसांच्या प्रशिक्षणाचा फायदा तुमच्या शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वाचे ठरू शकते असे यावेळी ते म्हणाले.

 याप्रसंगी डॉ. साताप्पा खरबडे आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले की राहुरी कृषि विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला असून यामध्ये विद्यार्थ्यांमधील उद्योजकता विकसित करणे याचबरोबर प्राध्यापकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत करणे यासारख्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. अद्ययावत नाविन्यपूर्ण विषयांमध्ये संशोधन होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या संपन्न असा स्टाफ महत्त्वाचा असतो. यासाठी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षणामधून त्याची पुर्तता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विठ्ठल शिर्के यांनी यावेळी या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थींना फळपिकांमधील जैविक व अजैविक ताण व्यवस्थापनासाठी जैवतंत्रज्ञान तंत्रज्ञानासंबंधीची महत्त्वाची माहिती मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की या प्रशिक्षणामध्ये फळपिकांवर झालेल्या संशोधनातील विविध मुद्द्यांवरील विषयांचा समावेश असून प्रशिक्षणार्थींनी जास्तीत जास्त ज्ञान अवगत करावे. 

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बी.टी. पाटील यांनी या प्रशिक्षणाची रुपरेषा तसेच आत्तापर्यंत घेतलेल्या प्रशिक्षणांचा आढावा सादर केला. या 21 दिवसीय प्रशिक्षणामध्ये 54 विविध विषयांवर व्याख्याने तसेच नऊ प्रात्यक्षिके व चार अभ्यासदौरे आयोजीत करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यातील 25 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर क्षिरसागर यांनी तर आभार प्रशिक्षण कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. जितेंद्र ढेमरे यांनी मानले. यावेळी विविध विभागांचे विभाग प्रमुख तसेच उद्यानविद्या विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.