पर्यावरण संवर्धनाचे कृषी विद्यापीठ मॉडेल विकसित करू -कुलगुरू डॉ.विलास खर्चे
*पर्यावरण संवर्धनाचे कृषि विद्यापीठ मॉडेल विकसीत करु*
*- कुलगुरु डॉ. विलास खर्चे*
वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्यावर प्रभावी उपाय म्हणून वृक्षलागवड ही सर्वात सोपी आणि परिणामकारक उपाययोजना आहे. वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषून घेत वातावरण शुद्ध करतात तसेच मृदा व जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतात. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि कृषि विद्यापीठाचा परिसर स्वच्छ, सुंदर व हरित करु. पर्यावरण संवर्धनाचे कृषि विद्यापीठ मॉडेल विकसीत करु असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.
आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरास प्रत्यक्ष भेट देऊन वनमहोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. बी. टी. पाटील, मृद व जलसंधारण विभाग प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र काशिद व कापुस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ कापुस पैदासकार डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना निसर्गापासून प्रेरित हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी अशी असून हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी निसर्गाधारित उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हे शाश्वत विकासासाठी अत्यावश्यक आहे. आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्याची हमी आहे असे मत कुलगुरु डॉ. खर्चे यांनी यावेळी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर 1 ते 7 जुलै दरम्यान साजर्या होणार्या वनमहोत्सव सप्ताहात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. कृषि दिनाच्या निमित्ताने वनमहोत्सव सप्ताहाद्वारे विद्यापीठ परिसरासह कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये व संशोधन केंद्रांमध्ये व्यापक वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करत सर्व महाविद्यालये व संशोधन केंद्रांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले. यावेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








