नगरपालिकेवर अतिक्रमणविरोधी मोर्चा – व्यापाऱ्यांचा संताप
श्रीरामपूर: शहरातील जुनी बाजारपेठेत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापाऱ्यांनी आवाज उठवत अतिक्रमणविरोधी राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर बेग, भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि सामाजिक कार्यकर्ते आपचे नेते तिलक डुंगरवाल त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनात स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जुनी बाजारपेठ परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आपचे नेते तिलक डुंगरवाल यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, "व्यापाऱ्यांची मागणी आहे की, रस्त्याची रुंदी 50 फूट करण्याऐवजी 40 फूट ठेवावी." व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर प्रशासनाने 50 फूट रुंदीचा निर्णय कायम ठेवला, तर अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त होतील आणि त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून, व्यापाऱ्यांचे हित आणि शहर विकास यांचा समतोल राखून योग्य तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकत प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "शहरातील व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात व्यापार वाढण्याची संधी असते, पण प्रशासनाच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा फटका बसेल." त्यांनी प्रशासनाला रस्त्याची रुंदी 50 फूट करण्याऐवजी 40 फूट ठेवण्याची मागणी केली, जेणेकरून व्यापाऱ्यांचे नुकसान टळेल आणि त्यांची उपजीविका सुरक्षित राहील. "व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा विचार न करता थेट कारवाई करणे अन्यायकारक आहे," असेही त्यांनी ठामपणे सांगितले. व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे त्यांच्या व्यवसायावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून योग्य तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
जुनी बाजारपेठ परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची वाढती चिंता लक्षात घेता, राज्याचे जलसंपदामंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील लवकरच या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी आपल्या भाषणात दिली. दिनकर यांनी सांगितले की, "हा विषय स्थानिक जनतेच्या हिताचा असून, त्यावर त्वरित निर्णय घेतला गेला पाहिजे." व्यापाऱ्यांचे रोजगार व उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून न्याय्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, "व्यापाऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय घेतला गेला, तर आम्ही शांत बसणार नाही.मोर्चादरम्यान व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणा देत आपला विरोध दर्शवला. स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या भावनांचा आदर करून त्वरित योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
व्यापाऱ्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. घोलप यांनी स्पष्ट केले की, "व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाच्या नियमानुसार आणि त्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल." त्यांच्या या आश्वासनामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग, आपचे नेते तिलक डुंगरवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाप्रमुख दीपक पठारे, भाजपा जिल्हा सचिव दत्ता खेमणर, पत्रकार समाजसेवक समीर माळवे, कामगार नेते नागेश सावंत, समर्थ ग्रुप चे विकास डेंगळे, व्यापारी असोसिएशनचे स्वप्निल चोरडिया, गौतम उपाध्ये, संजय कासलीवाल, ऍड. सुभाष जंगले, रुपेश हरकल, सचिन बाकलीवाल, नगरसेवक जितेंद्र छाजेड, बंडू शिंदे, भैय्या भिसे, प्रदीप जाधव अमित मुथा, उमेश अग्रवाल, आणि स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापारी वर्गाच्या एकजुटीमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला .जी जागा सरकारी आहे ती पुढील काम शहर विकास साठी आम्हाला गरजेची आहे अशी भूमिका मुख्याधिकारी यांनी जारी घेतली असल्यास, आता नगरपरिषदेच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु या ज्वलंत प्रश्नावर सदर आंदोलना मुळे, रसत्यावर उतरून घेतलेल्या भूमिके मुळे व्यापारी व जनतेमध्ये सकारात्मक चर्चा आहे.पालिका प्रशासन आता काय भूमिका घेणार याकड़े आता सार्वाचें लक्ष आहे