अशोकनगर मध्ये भर वस्तीत बिबट्याने घरात घुसून तीन गाभण शेळ्यांना जीवे मारले...

अशोकनगर मध्ये भर वस्तीत बिबट्याने घरात घुसून तीन गाभण शेळ्यांना जीवे मारले...

श्रीरामपूर:- ( प्रतिनिधी )श्रीरामपूर शहारा लगत असणाऱ्या अशोकनगर मधील मालवीय वाडी या ठिकाणी रामकुमार मोहन गायकवाड व संगीता गायकवाड हे कुटुंब ऊसतोडी चे व बँड वाजविण्याचे काम करतात. काल रात्री ते सातारा या ठिकाणावरून ऊसतोडीचे काम उरकून राहत्या घरी आपल्या जनावरा सोबत घरी परतले . त्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांची जनावरे व तीन गाभण शेळ्या देखील होत्या. काल संध्याकाळी ते घरी परतल्या नंतर रात्री 9 वाजेच्या दरम्यान त्यांनी त्या गाभण शेळ्या त्यांच्या स्वयंपाक करीत असलेल्या खोली मध्ये बांधून ठेवल्या व लगत असणाऱ्या दुसऱ्या खोलीत ते झोपी गेले. परंतु रात्री 11 ते 12 दरम्यान रामकुमार यांची पत्नी संगीता यांना बकऱ्याच्या ओरडण्याचा आवाज आला व स्वयंपाक घरातील मांडणीवर असलेले भांडे खाली पडण्याचा आवाज आल्यानंतर संगीता यांनी दरवाजा उघडला असता त्यांना घराच्या मागील बाजूस असणारा दरवाजाची खालची फळी तोडून बिबट्याने घरात प्रवेश करून त्यांच्या गाभण असलेल्या शेळ्यांचा फडशा पाडलेला त्यांना दिसला व त्या सर्व गाभण शेळ्या मेलेल्या अवस्थेत अस्तव्यस्त पडलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा करून त्यांच्या पतीला व शेजारी असणाऱ्यांना लोकांना उठवले त्या दरम्यान लोकांची आरडाओरडा ऐकून बिबट्याने घराच्या मागील बाजूस असणाऱ्या शेती महामंडळाच्या मोकळ्या जमिनीमध्ये धूम ठोकली.आवाजाने आसपासचे सर्व नागरिकांना जमा होऊन आराडा ओरड करीत शेती महामंडळाच्या मोकळ्या जमिनीत बॅटरी च्या साह्याने बघितले असता बिबट्या त्यांना त्या मोकळ्या शेतात पळताना दिसला. काही काळ त्या ठिकाणी  नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले.  परिसरातील अनेक नागरिक बिबट्याच्या नेहमी येणे जाण्याने दहशती मध्ये वावरत आहेत. मागील काही दिवसापूर्वी याच परिसरात पवार यांच्या 7 ते 8 शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. तेव्हापासून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती परंतु अद्याप पर्यंत वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत अजूनही पिंजरा लावलेल्या नाही.त्यामुळे या परिसरात ही दुसरी घटना घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. निपाणी वडगाव परिसरात पत्रकार असलेले रामकुमार यांचे मित्र  प्रशांतराजे शिंदे यांना घटनेची प्रथम माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी त्वरित भेट देऊन निपाणी वडगाव चे प्रथम नागरिक सरपंच यांना घटनेची  माहिती फोनवरून कळवली.सरपंच यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन व वनाधिकाऱ्यांना फोनवरून घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्यास सांगितले. या पशुधनावर सदर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळे हे पशुधन गेल्यामुळे त्या कुटुंबामध्ये अतिशय दुःखद वातावरण पसरले आहे. वेळोवेळी बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई त्वरित करणे गरजेचे आहे.घटनास्थळी पंचाययात समितीचे मा. विस्तार अधिकारी अशोक बोरुडे, संदिप बापूसाहेब तोरणे यांच्या सह अनेक नागरिक भेट देत असून या कुटुंबाचे सांत्वन करीत आहेत.