राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफणचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिल्यास नवनविन यंत्रांची निर्मिती होऊ शकते - संचालक डॉ . सी . आर . मेहता

राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफणचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिल्यास नवनविन यंत्रांची निर्मिती होऊ शकते - संचालक डॉ . सी . आर . मेहता

*राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफणचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ*

*विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिल्यास नवनविन यंत्रांची निर्मिती होऊ शकते*

*- संचालक डॉ. सी.आर. मेहता*

*राहुरी विद्यापीठ, दि. 25 मे, 2024*

             तिफण या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नविन स्वयंचलीत यंत्रांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत आहे. आजचे यथक्ष स्वयंचलीत तंत्रज्ञानाचे असून या स्पर्धेमध्ये शेतीसाठी उपयोगी पडणार्या यंत्रांची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. तिफण स्पर्धा म्हणजे देशामधील कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी.आर. मेहता यांनी केले. 

            महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफण-2024 या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी डॉ. सी.आर. मेहता बोलत होते. याप्रसंगी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, आंतरविद्या जलसिंचन शाखेचे विभाग प्रमख तथा कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, कार्यक्रमाचे समन्वयक सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स इंडियाचे श्री. अजय अग्रवाल, सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स इंडियाचे ऑफ हायवे अध्यक्ष डॉ. कृष्णांत पाटील, कृषि यंत्रे व अवजारे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड, डॉ. रविकिरण राठोड, डॉ. प्रविण कदम व सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्सचे श्री. स्वप्नील बागुल, श्री. अभिलाश साहु, श्री. धमेंद्र नागर, श्री. आनंद पफळ, श्री. पराग चौधरी, श्री. के.सी. गोरा हे अधिकारी उपस्थित होते. 

             यावेळी डॉ. दिलीप पवार मार्गदर्शन करतांना म्हणाले की विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये काम करत असतात पण हेच काम त्यांनी प्रक्षेत्रावर करुन एखादे यंत्र शेतकर्यांच्या गरजेनुसार विकसीत करणे व कृषि यांत्रिकीकरणाला चालना देणे तसेच उद्योजकतेचे धडे यातून मिळावेत हा या तिफण स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून या स्पर्धेचा विषय ट्रॅक्टरचलीत किंवा स्वयंचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे हा आहे. सदर स्पर्धेसाठी देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील 73 संघ सहभागी झाले होते. त्यातील फेज 1 मध्ये 43 संघाची निवड झाली आणि अंतीम फेरीसाठी सहा राज्यातून 27 संघाची अंतीम फेरीमध्ये निवड झालेली आहे. यामध्ये पंजाब राज्यातील दोन संघ, तामिळनाडू राज्यातील चार संघ, मध्येप्रदेश दोन संघ, केरळा व तेलंगणा प्रत्येकी एक संघ व महाराष्ट्रातून 17 संघ असे एकुण 27 संघ सहभागी झालेले आहे. आज आणि उद्या चालणार्या या स्पर्धेत या अंतिम 27 संघानी बनविलेल्या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रांच्या पाच वेगवेगळ्या सेक्शनमध्ये चाचण्या होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष शेतावरती देखील या यंत्रांची परिक्षा घेतली जाणार असल्याचे डॉ. सचिन नलावडे व श्री. अजय अग्रवाल यांनी सांगितले. या अंतिम फेरीत 27 संघातील स्पर्धेसाठी एकुण 556 विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि 60 पेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृषि यंत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील 36 पंचांची नेमणूक करण्यात आलेली आहे.