विकसित कृषी संकल्प अभियान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर - संचालक विस्तार शिक्षण डॉ.गोरक्ष ससाणे..

विकसित कृषि संकल्प अभियान हा केंद्र सरकारचा एक स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि क्षेत्रात काम करणार्या यंत्रणा एकत्र येऊन शेतकर्यांना गावांमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहे. यामुळे शेतकर्यांच्या काय समस्या आहेत हे या उपक्रमातील अधिकारी जाणून घेतात. यामुळे विकसित कृषि संकल्प अभियान शेतकर्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर व पारनेर कृषि विभाग यांच्या समन्वयाने विकसित कृषि संकल्प अभियानांतर्गत मौजे राळेगण सिध्दी ता. पारनेर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी राळेगणसिद्धी गावचे सरपंच श्री. लाभेश औटी, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील विषय विशेषज्ञ प्रा. अन्सार आत्तार, किटकशास्त्रज्ञ डॉ. रणजीत कडू, बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ श्री. घुले, श्री. सोनवणे व पारनेरचे तालुका कृषि अधिकारी श्री. गजानन घुले, मंडल कृषि अधिकारी श्री. जालिंदर गांगर्डे, उपकृषि अधिकारी श्री. साठे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. देवेंद्र जाधव व सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती मयुरी मनतकार उपस्थित होते.
याप्रसंगी राळेगणसिद्धी या ठिकाणी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी यावेळी विकसित कृषि संकल्प अभियानाला शुभेच्छा दिल्या. यावेळी शेतकर्यांना खरीप हंगाम नियोजन बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रा.आत्तार, डॉ. कडू, श्री. घुले व श्री. सोनवणे यांनी उपस्थित शेतकर्यांना सोयाबीन, मका, मुग, तुर, पिकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. यावेळी सोयाबीन उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या कार्यक्रमासाठी राळेगणसिद्धी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.