*नैसर्गिक शेतीतील निविष्ठांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल फलदायी ठरेल.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 8 मे, 2026*
रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेले जमिनीचे आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच शेती शाश्वत करण्यासाठी पुणे येथे मा. राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठांच्या निर्मितीचा अडसर येऊ नये म्हणून शेतावरच निविष्ठा तयार करावयाच्या आहेत. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेले एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल फलदायी ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी आत्माचे संचालक श्री. सुनील बोरकर, कृषी संचालक श्री. विनयकुमार आवटे, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. दत्तात्रय गवसाने, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, प्रकल्प संचालक, आत्मा, अहिल्यानगर श्री. प्रदीप लाटे, प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे श्री. सुरज मडके, प्रकल्प संचालक, आत्मा, सोलापूर डॉ. कांताप्पा खोत, कृषीविद्या विभागाचे प्राध्यापक व सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे, रोमिफ इंडियाचे संस्थापक डॉ. प्रशांत नाईकवाडी, कृषि विज्ञान केंद्र, दहिगावणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शामसुंदर कौशिक, श्री. सागर गायकवाड, श्री. राजाराम गायकवाड व श्रीरामपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. प्रवीण गोसावी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे आपल्या मार्गदर्शनामध्ये पुढे म्हणाले की शेण, गोमूत्र, पिकांचे अवशेष हे सर्व शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे असून त्यासाठी नैसर्गिक शेतीला समजून घेतले पाहिजे. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार्या तज्ञांकडून प्रथम समजून घ्या, आपल्या मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नका. श्री. सुनील बोरकर नैसर्गिक शेती बहुआयामी दृष्टिकोन या विषयावर बोलताना म्हणाले की या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शेतकर्यांवर एक विशेष जबाबदारी आहे, ती म्हणजे या कार्यशाळेतून त्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या भागात नैसर्गिक क्रांती घडवायची आहे. तुम्ही तुमच्या शेतीमध्ये केलेला प्रयोग इतर लोकांना सांगायचा आहे. मला जे मिळाले आहे ते मी इतरांना देईल या विचाराने प्रेरित होऊन येथून जायचे आहे. प्रत्येकाने 30 ते 40 शेतकर्यांना नैसर्गिक शेती संबंधित ज्ञान द्यायचे आहे. तांत्रिक सत्रामध्ये अहमदाबाद येथील गीर गो शाळेचे संस्थापक श्री. गोपाळभाई सुतारीया, डॉ. प्रशांत नाईकवाडी, डॉ. उल्हास सुर्वे व श्री. दत्तात्रय शेरकर यांनी नैसर्गिक शेतीशी संबंधीत विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नैसर्गिक शेतीमध्ये वापरण्यात येणार्या विविध निविष्ठांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दत्तात्रय गवसाने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उल्हास राक्षे यांनी तर आभार श्री. प्रदीप लाटे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी अहिल्यानगर, पुणे व सोलापूर या विभागातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नैसर्गिक शेती करणारे 1500 शेतकरी उपस्थित होते.








