ठेकेदाराने नागरिकांना मारायचे ठेके घेतले आहेत काय ? - देवेंद्र लांबे .

*ठेकेदाराने माणसं मारायचे ठेके घेतले आहेत काय ? देवेंद्र लांबे*
राहुरी येथे सोमवार दि.२६ मे २०२५ रोजी शहारानजीक नगर मनमाड रस्त्याच्या कडेला विठ्ठला लोन्स समोर भूमिगत गटारीचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे नगर मनमाड रस्त्यावर प्रवास करणाऱ्या रहेमान पठाण या प्रवाशाची रस्त्यावर दुचाकी घसरून पडून अपघात होवून निधन झाले.
सबंधित अपघात प्रकरणी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख तथा नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य देवेंद्र लांबे पा. यांनी राहुरी पोलिस स्टेशन येथे पो.नि.संजय ठेंगे यांची भेट घेत सबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी श्री.देवेंद्र लांबे पा.म्हणाले कि, राहुरी शहराजवळ नगर मनमाड रस्त्याच्या कडेला अनेक दिवसांपासून सीएनजी पाईपलाईन ,पाण्याची पाईपलाईन टाकताना मोठया प्रमाणात नाल्या खोदण्यात आल्या होत्या,त्या नाल्या बुजवताना साईपट्टी खराब झाली होती त्याचे दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले होते.वरील सर्व कामे पावसाळ्याच्या आत पूर्ण करून रस्त्याची साईडपट्टी दुरुस्त करण्यात आली होती.
राहुरी शहरात भूमिगत गटारीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने वातावरणातील बदलाकडे दुर्लक्ष करत ऐन पावसाळ्यात भूमिगत गटारीच्या कामासाठी रस्त्याच्या कडेने पुन्हा नाली खोदाई करताना निघालेली माती नगर मनमाड महामार्गावर टाकल्याने रहदरीस अडथळा निर्माण झाला ,त्यात पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर टाकलेल्या मातीचा चिखल झाला; त्यावरून घसरून १० ते १२ दुचाकीस्वार घसरून पडले. त्यातील रहमान पठाण हे प्रवाशी नगर कडून शिर्डीच्या दिशेने जात असतांना वरील ठिकाणी चिखलामुळे दुचाकी घसरून महामार्गावर पडले व त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ठेकेदाराने मानस मारायचे ठेके घेतले आहेत काय ? असा संतप्त सवाल श्री.देवेंद्र लांबे पा.यांनी केला आहे.
सबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची माहिती व कामात हलगर्जीपणा केल्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना समक्ष भेटून देण्यात येणार असल्याचे श्री.देवेंद्र लांबे पा. यांनी म्हंटले आहे.
सबंधित ठेकेदाराने काम करताना कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने अपघातात रहेमान पठाण यांचा मृत्यू झालेला आहे.सदरील अपघातास कारणीभूत धरून सबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पो.नि.संजय ठेंगे यांच्याकडे श्री.लांबे यांनी केली आहे.