शिक्षण बचाव कृती समिती श्रीरामपूरचे वतीने सरकारी शाळा वाचवा-शिक्षण वाचवा आंदोलन

शिक्षण बचाव कृती समिती श्रीरामपूरचे वतीने सरकारी शाळा वाचवा-शिक्षण वाचवा आंदोलन

श्रीरामपूर:-शुक्रवार 6 ऑक्टोबर 2023 सकाळी 11.00 वाजता.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय, श्रीरामपूर येथे शिक्षण बचाव कृती समिती श्रीरामपूरचे वतीने मोर्चा काढण्यात आला. 

 महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील ६५ हजार सरकारी शाळा (जिल्हा परिषद) आणि स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, महानगरपालिका) या योजनेअंतर्गत खाजगी कंपन्या, संस्था किंवा समाजसेवी व्यक्तींना दत्तक दिल्या जाणार आहे.  त्याचबरोबर दुर्गम   भागातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तब्बल १४ हजार ७८३ शाळा बंद करून या भागात एकत्र समुह शाळा योजना राबविण्यास नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे  पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मान्यता देण्यात आली आहे.

शासनाच्या या निर्णयाविरोधात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  शासनाचा हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने चुकीचा आहे.  सरकारी शाळा खाजगी कंपन्यांकडे म्हणजेच भांडवलदारांकडे सोपवण्याची कल्पना हे शिक्षणाचे खाजगीकरण आणि बाजारीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.  या निर्णयाचे समाजात आणि शिक्षण क्षेत्रात दूरगामी परिणाम होतील, अशी भीती शिक्षण व सामाजिक जाणकार व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.  या योजनेनुसार राज्यातील सरकारी शाळा, खासगी कंपन्या संस्था किंवा  व्यक्तींना दर 5 ते 10 वर्षांनी दत्तक देऊन त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव त्या शाळेला दिले जाईल.

     19 ऑक्टोबर 1882 रोजी महात्मा फुले यांनी हंटर एज्युकेशन कमिशनसमोर सादर केलेल्या निवेदनात किमान १२ वर्षे वयाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, अशी सूचना करण्यात आली.  शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन

 महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी अतोनात प्रयत्न केले व आपल्या प्राणांची आहुती दिली.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेच्या माध्यमातून शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.  अशा या पुरोगामी विचारांचा वारसा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असा चुकीचा निर्णय घेणे ही अतिशय गंभीर बाब आहे.

     कल्याणकारी राज्यात शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारची असते.  बालकांच्या मोफत शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार, सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आणि ते उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.  मात्र सरकार आपली जबाबदारी झटकतांना दिसत आहे.  सरकारी शाळांकडे पाहण्याचा शासनाचा दृष्टीकोन दिवसेंदिवस बदलत असल्याचे जाणवते.  शिक्षकांना अध्यापन सोडून इतर अशैक्षणिक कामात गुंतवले जात असून त्यांच्याकडून पुन्हा दर्जेदार शिक्षणाची व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा केली जाते आहे.  राज्यातील सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा चांगला असतांना सरकारी शाळांची बदनामी करून या शाळा खासगीकरणाच्या नावाखाली मर्जीतील  बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांची 30 हजार पदे रिक्त आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.  भविष्यात गरीब मुले कुठे शिकणार?

सध्या गरीबांची मुले स्थानिक सरकारी शाळांमध्ये शिकत आहेत.  शिक्षणाचे खाजगीकरण झाले तर गरीब मुलांच्या शिक्षणाचे काय होणार?  असा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण होईल किंबहुना झाला आहे. मोर्चेकरांच्या पुढील प्रमुख मागण्या आहेत. 

1) 'दत्तक शाळा योजने' अंतर्गत शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा.  2) 'शालेय समुह योजने' अंतर्गत 20 पटांपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतले पाहिजे.

३) अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत.

४)  नोकऱ्यांचे कंत्राटीकरण थांबवावे.

 ५)  शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी. 

६) शैक्षणिक प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.

 ७) एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर केला पाहिजे.

 ८) शिक्षणावर श्वेतपत्रिका काढावी.

 ९) विविध मूल्यांना बाधा पोहोचेल असे बदल शैक्षणिक अभ्यासक्रमात करू नयेत.

१०) 'समान काम समान वेतन कायदा अमंलबजावणी करावी.

या मागण्या शिक्षण बचाव कृती समिती, श्रीरामपूरचे वतीने करण्यात आल्या व तसे निवेदन मा. निवासी नयब तहसीलदार श्री. वाकचौरे यांना देण्यात आले. 

 वरील विविध मागण्यांसाठी या मोर्चात शिक्षक, पालक, विद्यार्थी, सामाजिक शिक्षण क्षेत्रातील कामगार व विविध पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते व जागरूक नागरिकांनी सहभागी झाले होते. 

 यावेळी पी.एस. निकम सर सुनील मगर, अशोकराव जाधव सर (संपादक दैनिक लोकवेध) तुकाराम धनवडे सर शिवाजीराव गांगुर्डे प्रतापराव देवरे सर अशोकराव दिवे साहेब डी.एल. भोंगळे सर एम.एस.  गायकवाड सर, रितेश एडके, मुश्ताक भाई तांबोळी

फ्रान्सिस शेळके, अशोक बागुल, नानासाहेब पंडित अँडव्होकेट सिद्धार्थ बोधक, मच्छिंद्र ढोकणे, लेविन भोसले सर, राजेंद्र भोसले सर,दीपक कदम, पोपट खरात, राजू खरात आकाश शेंडे अन्तोन शेळके, सी एस बनकर

जाकीरभाई शाह

अशोकराव शेलार, जि जे शेलारसर, सुनीता दाभाडे, सीताराम जाधव, डॉ.अशोक शेळके, सुनील वाघमारे

 डी.आर.  त्रिभुवन, विठ्ठलराव गालफाडे, विलास अहिरे, आदि उपस्थित होते.